Wednesday 16 March 2016

Celebrating the day when Little Master scored his 100th Hundred!!!

आपण कधी सचिन तेंडुलकरला रागावलेला, वैतागलेला पाहिलंय ? फारच क्वचित परंतु तो त्या दिवशी चक्क भडकलेला होता. तो दिवस होता ५ नोव्हेंबर २००९ व तो भारत वि ऑस्ट्रेलिया ह्याच्यातील झालालेल्या मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना होता. ह्या आधी मालिका २-२ अशी बरोबरीत होती व पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी होती. पन्नासाव्या षटकाचा शेवटचा चेंडू जेव्हा सचिन पाशी आला तेव्हा त्याने तो चक्क रागाच्या भरात जमिनीवर आपटला व मैदान सोडले. त्या कृत्याचा तेव्हा कोणालाच काहीच अर्थ लागला नाही परंतु त्याचा अर्थ इतका लवकर लागेल याची कोणालाच कल्पना नव्हती. भारतासमोर आव्हान होते ३५१ धावांचे व सेहवाग तेंडुलकर  ही सलामीची जोडी भीम पराक्रमाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. पहिल्या षटका पासुनच दोघेही जण अत्यंत आक्रमक रित्या खेळत होते. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटके खेचत सचिन जणु आपल्या चाहत्यांना जुन्या सचिनची आठवण करून देत होता असेच वाटत होते. सचिनचे अर्धशतक होत असतानाच सेहवाग तंबूत परतला. परंतु सचिनने आक्रमकता कायम ठेवत झपाझप धावा केल्या व धावफलक हलता ठेवला. सेहवाग पाठोपाठ युवराज, ढोणीही बाद झाले व भारताची परिस्थिती नाजुक झाली. परंतु स्तिथप्रज्ञ राहुन सचिनने आपली झुंज चालुच ठेवली. सचिनने आपले शतक पूर्ण केले ते फक्त ८० चेंडूंमध्ये. जेव्हा त्याने अभिवादन करण्यासाठी प्रेक्षकांकडे बॅट दाखवली तेव्हा त्याच्या देहबोलीत जबर इच्छाशक्ती व कमालीचा आत्मविश्वास दिसत होता.
सचिन शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना 
शतकानंतरही आपल्या धावांची गती कायम राखत तो भारताला आपल्या ध्येयाच्या जवळ जवळ नेत होता. क्रमांक ६ वर आलेल्या रैनाचीही सचिनला सुरेख साथ लाभली व रैना-सचिन जोडीने  भारताची बाजु मजबुत बनवली. परंतु ही जोडी खतरनाक वाटतीये तोच ऑस्ट्रेलियाने रैनाचा अडथला दुर केला. त्या सुमारास सचिनने  आपला १५० धावांचा टप्पा पुर्ण केला.  आता जडेजाला बरोबर घेत सचिनने आगेकुच सुरु ठेवली. संयम व आक्रमकता यांचा सुंदर मिलाप राखत सचिनने भारताची नाव अगदी विजयाच्या उंबरठ्यावर नेउन पोहोचवली. परंतु मोक्याच्या क्षणी जेव्हा भारताला ३ षटकात सुमारे २० धावा हव्या होत्या तेव्हा मकायच्या  धीम्या गतीच्या चेंडू वर शोर्ट फाईन लेग करवी तेंडुलकर १७५ला झेलबाद झाला. स्टेडियम सुन्न झाले. सर्वकडे एकच शांतता पसरली व मग मात्र सगळ्यांना समजले की एक वादळ शांत झाले होते . कारण ती सचिनची खेळी म्हणजे जणु एक घोंघावते वादळच होते. त्या वादळाने  ऑस्ट्रेलियाला संपूर्णपणे झोडपले होते.

सचिनची ती खेळी मला सदॆव लक्षात राहिल कारण ती खेळी एकाग्रता, ध्यास, जबर इच्छाशक्ती व कमालीचा आत्मविश्वास या सुवर्ण गुणांनी खचाखच भरली होती. तसेच त्या खेळीमुळे माझा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलुन गेला, माझ्यातला खरा क्रिकेटप्रेमी जागा झाला व मला उमंगल की खरंच क्रिकेट माझ्या आयुष्यातला किती महत्वाचा घटक आहे ते आणि त्यानंतर मी क्रिकेट बद्दल खऱ्या अर्थाने भावुक झालो.
इतक्या अप्रतिम खेळीनंतरही भारत अवघ्या ३ धावांनी पराभुत झाला, तो पराभव अगदी प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागला पण सचिनने जी काही खेळी केली ती पहायला मिळाली हे आपले भाग्यच.

No comments:

Post a Comment